सावू छानपैकी नटूनथटून वडाला फेऱ्या मारत होती आणि बाकीच्या सगळ्या तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होत्या.सकाळी नऊ वाजल्यापासून सावू वडाला फेऱ्या मारत होती. सावू एकदम साधीशी, गोड मुलगी होती. खेड्यातून शहरात लग्न करुन आलेली. घरची गरीबी होती. नवरा ठेकेदार होता. पैसेवाला होता. अंगात पैशाची मुजोरी होती. कंत्राट मिळाले कि आठदहा दिवस घराबाहेर असायचा.
आज वटपौर्णिमा होती म्हणून ती छान तयार होऊन पुजेची तयारी करून वडावर आली होती.
आता मात्र एक एक फेरा मारता मारता पाय जड होत होता तिचा आणि शेवटी दोरा संपलाच. किती फेऱ्या मारल्या? 1/2 /3 कि 40/45??
खूप थकली होती ती. तहान पण लागली होती. वडाला घालायला आणलेल पाणीच बिचारी प्यायली होती तरीही घसा सुकला होता.भूक पण लागली होती.डोळ्यासमोर अंधेरी येत होत.ती कशीबशी चालत घरी आली तर दार बंदच.
डोकच फिरल तिचं. बाजूला पडलेला विळा उचलला आणि जोरात दार ठोठावल. तसा तिचा नवरा ओरडत, शिव्या देत बाहेर आला आणि म्हणाला सांगितलं होत नं दुपारपर्यंत घरी येऊ नको म्हणून!!बेअक्कल साली !!चमेली आली आहे आज,समजत नाही का?
आणि त्याने तिला मारायला हात उचलला. तसे तिने विळ्याने सपासप त्याच्यावर वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तरी ती वार करतच होती, बेफामपणे!
चमेली घाबरून पळून गेली.
पोलिस आलेत.तिला पकडलं.
ब्रेकिंग न्यूज!!
*वटपौर्णिमेच्या दिवशीच बायकोने नवऱ्याची हत्या केली!!*
ती सांगत होती," *सत्यवानासारखा नवरा असेल तरच सावित्री बना"*.नाहीतर .........