घर

घर
ये तेरा घर ये मेरा घर
किसीको देखना हो गर
तो पहले आके माॅंगले तेरी नजर मेरी नजर।

हे गाणे फार अर्थपूर्ण आहे आणि माझं आवडतं! घर या एका शब्दात अख्खी दुनिया सामावली असते. एवढ्या मोठ्या पृथ्वीवर एक जागा अशी हवी की जिथून आपल्याला कोणी हाकलणार नाही किंवा निघून जायला सांगणार नाही. ते आपलं हक्काचे घर असते.
कुठेही जा घरी येण्याची ओढ कायम असते. ' घरी आलं की कसं छान वाटतं' हे बाहेर गेलेल्या प्रत्येकाचे वाक्य असते. मग तुम्ही फाईव्ह स्टार मधे राहा की अजून कुठे! दोन दिवस बाहेर बरं वाटतं तिसऱ्या दिवशी आपल घरचं! ही ओढ काय असते माहित नाही पण एक सुंदर भावना आहे.

आम्ही स्त्रिया तर दोन दोन घरांच्या स्वामिनी असतो. अर्थात माहेर आणि सासर! नवीन नवीन लग्न झाले की माहेरची ओढ खूप असते पण एकदा का संसारात रमलो की माहेरी 3/4 दिवस बरं वाटतं मग आपल्या घराची ओढ लागते अर्थात माहेर सोडतांना हुरहुर लागतेच! आई वडीलांसारखं ते घर पण माया देतं. तिथला कोपरा न कोपरा आपल्या परिचयाचा असतो.
आमच्या इथे तर स्वामी समर्थांचा अतिशय सुंदर आणि मोठा मठ आहे. प्रसन्न वाटतं तिथे गेल्यावर! घरापासून दोन मिनिटांच्या अंतरावर! बाबा रोज सकाळी हार घेऊन जायचे. मी शक्यतोवर गेले की मठात जातेच. श्रद्धा म्हणून की बाबांची आठवण म्हणून माहीत नाही पण पाऊल तिकडे वळते हे नक्की!

माझ्या आईने देवघरात एका अलमारीवर एका लहान4/5 वर्षाच्या मुलीचे मोठे पोस्टर लावले होते. का तर मी लहानपणी तशी दिसायची. कितीतरी वर्षे ते पोस्टर होतं. आई गेल्यावर ते काढलं पण आता मात्र ती आठवण कायम मनात राहील. तेव्हा आईला हसायचे की काही काय आई! आता डोळ्यात पाणी आहे लिहीतांना!

मैत्रीणींकडून मागून आणलेली रोपे! औंदुबराचे झाड आणि त्याची खाली पडणारी फळे आणि त्यावरून घसरुन पडणारे आम्ही! येणारा भारद्वाज! त्याचा तो विशिष्ट आवाज! पेरू, सीताफळाची मजा! ते अंगण आणि सीताबाई शेण पाण्यात कालवून त्याचा सडा टाकायची. कोपऱ्यात लगडलेले शेवग्याच्या शेंगांचे झाड! मैत्रीणी आणि भावंडांबरोबर खेळलेली लगोरी आणि टिक्करबिल्ला!
घर म्हणजे आठवणींचे गाठोडे! कदाचित पन्नाशी /साठी गाठल्यावर हे गाठोडे जास्त जवळचे वाटते. निवांत मिळालेला वेळ हे ही एक कारण असेल.

कधीतरी देवाचे आभार मानावेसे वाटतात की आपल्याला रम्य आणि सुंदर बालपण मिळाले. एक सुखवस्तू घर मिळाले. घर जरी दगडमातीचे असले तरी सोन्यासारखी माणसे त्या घराने दिली, संस्कार दिलेत. मुख्य म्हणजे वाचनाचे संस्कार याच घरात झाले. तेच संस्कार मुलांना द्यायचा प्रयत्न केला. घराचे घरपण जपण्यासाठी जीवाचा आटापिटा केला अर्थात प्रत्येक पालक हेच करतात.

कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांना दिलेले प्रेम आणि जिव्हाळा अनुभवून ते घर ही आनंदून जातं असेल आणि हळूच स्वतःशी गुणगुणत असेल..

जो चाँदनी नहीं तो क्या, ये रोशनी है प्यार की,
दिलों के फूल खिल गए, तो फ़िक्र क्या बहार की।
ये तेरा घर ये मेरा घर।

वर्षा हेमंत फाटक, पुणे


- Varsha Hemant Phatak
« Prev Share
Likes: 0 Views: 21