स्वतःच्या नकारात्मक बाजू


नकारात्मक हा शब्द कोणालाच आवडत नाही, स्वतःच्या बाबतीत बोलतांना! इतरांच्या बाबतीत सांगायचे असेल तर बाह्या सरसावून पुढे येतील. पण गोम इथेच आहे की स्वतःच्या नकारात्मक बाजू लिहायच्या!
कौन माई का लाल.., खुदकी नकारात्मकता को ललकारनेकी हिंमत किसमें हैं? असले हिंदी सिनेमातले विचित्र डायलॉग समोर यायला लागले.

आता खरं लिहायचे की खोटे? की तेरी भी चूप मेरी भी चूप! प्रत्येक विषयावर लिहीणे आवश्यक थोडीच आहे पण इथेच नकारात्मक बाजू दिसून येते! वेगळा विषय दिसला की हात सळसळायला लागतात. जीवाला शांतता लाभत नाही. ही सुद्धा एकप्रकारे नकारात्मक बाजूच झाली.
स्वभावाला औषध नाही हेच खरं!

मग विचार केला की आपल्या नकारात्मक बाजू आपल्याला निरपेक्षपणे लिहीणे शक्यच नाही. आपण काय संत वगैरे कोणी नाही.
मग कोणाला तरी विचारायलाच हवे.

नवरा? नको आज सकाळीच वादावादी झाली आहे. मोठ्ठी यादीच देईल.

मुलगी नकोच!तिला कालच दोन शब्द सुनावून झाले आहे.

मग मुलगा! यस!

सून? नकोच!
नवीन नवीन आहे. काय तिला संकटात पाडायचे. (आणि उगीच बाणेदारपणा वगैरे दाखवला तर?)

ठरलं! मुलगा नक्की खरं खरं सांगणार!
फोन केला तर मेसेज, आई मी मिटिंगमध्ये आहे. आत्ता इथे सकाळचे अकरा वाजले आहे. अशी कशी विसरली तू?

माझी एक नकारात्मक बाजू कळली. वेळकाळ न बघता घाईघाईत आपण डायरेक्ट फोन करतो हे चूकीचे आहे. तिथे आत्ता सकाळ होती.
स्वभावातील घाई ही एक नकारात्मक बाजू माझी मलाच समजली.

मी खूप ग्रेट आहे, मला प्रत्येक काम वेळेवर आणि व्यवस्थितच हवं असतं. माझ्यामुळे घर चालतय! मी यांव मी ट्यांव ट्यांव!!! हे प्रत्येक गृहिणीला वाटतं. चूकीचे काहीच नाही पण असं घरच्यांना वाटायला हवे. कौतुक कमवावे लागते. सहज नाही मिळत. पण म्हणून स्वतःची टिमकी सतत मिरवणे ही एक नकारात्मकताच आहे.

कधी कधी अति व्यवस्थीतपणा आणि नको तिथे नियम पाळायच्या गोष्टी दुसऱ्याला त्रासदायक होतात हे नक्की!

(परवा दुपारी डेंटिस्टकडून येतांना एका मुलीने अर्धी जळलेली सिगारेट जिथे चार पाच गाड्या उभ्या होत्या तिथे शिस्तीत फेकली. मला बोलता येत नव्हते तरी मी तिला हाताने खुण केलीच की हे का इथे फेकलेस?)
आणि मला तिथे माझ्यातील नकारात्मकता दिसली की मी नुसतीच बोलले. मी उतरुन कृती का नाही केली? का त्या मुलीला ती फेकलेली सिगारेट उचलायला नाही लावली? तिच्याबरोबर असणाऱ्या दोन गुंड प्रवृत्तीच्या माणसांना मी घाबरले होते का? म्हणजे आपल्या सामान्य माणसाची ही एक फार मोठी नकारात्मकता आहे की आपणं नुसते बोलतो, करायची वेळ आली की शांत बसतो.

भीती आणि दहशत या समाजाच्या नकारात्मक बाजू आहेत. अर्थात वैयक्तिक भावना एकत्र झाल्यावरच समाज निर्माण होतो हे ही तितकेच खरे!

आजकाल सतत जाहिराती फिरत असतात. नकारात्मकता कमी कशी करायची? सकारात्मकता कशी वाढवायची? अनेक व्हिडिओ, प्रवचनांचा भडीमार होतो. त्याचा फायदा होतो की नाही माहित नाही. कारण मनातून जोवर ठरवत नाही तोवर कोणीही सकारात्मक होऊच शकत नाही.

नन्नाचा पाढा वाचणारे माझ्यासारखे खूप असतात. कुठे जायचं म्हटलं की माझा प्रश्न असतो आवश्यक आहे का?
इतक्या दूर? दिवसभर?
नको रे बाबा ! आपलं घर बरं!
घरकोंबडी कुठली!

ही माझी खूप मोठी नकारात्मक बाजू आहे. माझ्यासारखे खूप जण असतील.

प्रत्येकाची कोणतीतरी नकारात्मक बाजू असतेच. कोणीही परिपूर्ण नाही. पण तरीही ती नकारात्मकता थोडीफार कमी करता येते. स्वतःच स्वतःचे अवलोकन करुन चांगला बदल नक्कीच घडवून आणता येतो.

मग 'न' चा 'स' व्हायला वेळ लागणार नाही.

वर्षा हेमंत फाटक, पुणे

- Varsha Hemant Phatak





« Prev