ह्या ओळी मी दहादा तरी वाचल्या. माझी इच्छा माझं आयुष्य! प्रत्येकाचं स्वप्न! स्वतःच्या इच्छेप्रमाणे आयुष्य जगता आले तर काय बहार येईल! पण तसं घडतं का? आणि ते घडणं योग्य असेल का? कदाचित असेल ही! कारण प्रत्येक जण मग सुखी, समाधानी राहील. सगळीकडे शांतता नांदेल कारण प्रत्येकाची इच्छा पूर्ण होईल. हेवेदावे, असूया काहीच नसेलं! सुकून ही सुकून!
पण....
एखाद्याची इच्छा अयोग्य असेल तर? माझ्या इच्छेनुसार जग चालावे असे एखाद्याला किंवा बऱ्याच जणांना वाटत असेल तर! तर मग? ती दमदाटी होईल. माझी इच्छा इतरांच्या हक्कांवर गदा आणत असेल तर?
इच्छा एकमेकांना भेदून जातील, वादविवाद होतील.
मी तर म्हणेन जन्माला येणेसुद्धा आपल्या हातात नाही तर अख्ख आयुष्य स्वतःच्या इच्छेनुसार जगणं शक्य आहे का? आणि मरण ते तरी माझ्या इच्छेने येईल का? दुसर्याच्या आयुष्यावर हुकूमत गाजवणे चुकीचे आहे तसेच फक्त स्वतःच्या इच्छेनुसार जगणे ह्याचेही समर्थन करता येणार नाही. जगज्जेतेपणाची भावना विनाशाकडे नेणारी असते.
लहानपणी जेव्हा सतत मोठ्या माणसांचे ऐकावं लागतं तेव्हा वाटतं केव्हा एकदा मोठो होतो आणि माझ्या इच्छेनुसार आयुष्य जगतो पण जस जसे मोठे होत जातो तस तसे कळत की मोठे झाल्यावरही मनाप्रमाणे आयुष्य जगता येतेच असे नाही.
तिथेही अडचणी असतातच! डोंगराएवढ्या!
खरंतर कौटुंबिक आणि सामाजिक बांधिलकी असतांना माझी इच्छा ही प्रथम क्रमांकावर राहूच शकणार नाही. माझे, तुझे जाऊन आपले ही भावना निर्माण होते आणि मुख्य म्हणजे एकाधिकारशाही चालतं नाही. इच्छा ही योग्य असेल तर लोकशाहीत ती पटवून द्यावी लागेल. वैयक्तिक आयुष्यात कदाचित माझी इच्छा माझं आयुष्य माणूस जगही शकेल पण तरी कठीणच आहे. कारण तडजोडीशिवाय हे शक्य नाही आणि तडजोड म्हटलं की स्वतःच्या इच्छेला मुरड घालावीच लागते. ते आवश्यक आहे.
कारण कुटुंबातसुद्धा एकाची इच्छा दुसऱ्याची गळचेपी ठरत असेल तर तो अन्यायच ठरेल. मग माझ्या इच्छेला चूकीची दिशा मिळेल. कुटुंबात सुख नादांयच असेल तर माझी इच्छा, मी हवं तसं वागेन, हे योग्य ठरणार नाही. तसेच विवाहानंतरही एकमेकांच्या इच्छेचा आदर करुनच जगावे लागेल. फक्त माझी इच्छा म्हणून केलेली अरेरावी चालणार नाही.
इच्छा योग्य असेल तर स्वागतच होईल पण माझी इच्छा माझं आयुष्य या गोष्टीचा इतरांना त्रास होत असेल तर त्याचे दुष्परिणाम फार वेगळे असतील.
माझा मोबाइल माझी प्रतिक्रिया! याप्रमाणे माझी इच्छा माझं आयुष्य! हे समीकरण असतं तर किती छान झालं असतं नं! पण खोलवर विचार केला तर मला तरी कठीणच दिसतंय!