ललित : लवकरात लवकर


हा शब्द मागील काही महिन्यांपासून सतत कानावर पडतो आहे अर्थात कारणही तसेच होते. आतंकवाद्यांनी आपल्यावर केलेला भ्याड हल्ला! अत्यंत निंदनीय!

आतंकवाद्यांना कंठस्नान घालून लवकरात लवकर न्याय मिळावा ही प्रत्येक भारतीयाची इच्छा होती आणि ती खरंच पूर्ण झाली. पाकिस्तानला धडा मिळाला. अपेक्षेपेक्षा लवकर आणि लक्षात राहील असा!

आणि अजून एक प्रसंग 4/5 दिवसांपूर्वी घडला. एका दुर्दैवी आईची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या! 9/10 महिन्याच्या बाळाला पोरक करून त्या माऊलीने सर्व संपवल. जीव बाळातही अडकला नाही म्हणजे सहनशक्तीचा अंत झाला असेल हे नक्की!

तिलाही लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी होते आहे.
ते रास्तच आहे.
पण अशी एखाद्या घटना घडतांना दिसली तर आपण लवकरात लवकर मदतीला जातो का? की कुठे मारहाण होतांना दिसली की तिथून लवकरात लवकर पळ काढतो! मला काय करायचे म्हणून!

लवकरात लवकर तिची तक्रार नोंदवली गेली असती तर? लवकरात लवकर तिला मदत मिळाली असती तर?

या लवकरात लवकर... शब्दामागे कितीतरी गोष्टी असतात. कायद्याची पूर्तता, सज्जड पुरावे,भ्रष्टाचार, जबानी सर्व कटकटीच्या गोष्टी.
पण सामान्य माणसाला मात्र लवकरात लवकर सर्व हवे असते.

कारण..... त्याची मेमरी फार कमी काळाची असते हे जाणवतं. जोपर्यंत टीव्हीवर या घडलेल्या गोष्टींचा सतत मारा होतं असतो तोपर्यंत सामान्य माणूस अगदी लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी तावातावाने बोलतो पण पंधरा दिवसांनंतर अजून एखादी घटना घडते. मग आधीची घटना तो सोयीस्कररित्या विसरतो आणि लवकरात लवकर त्या दुसर्‍या घटनेचा निकाल लावण्याच्या मागे लागतो. का होतं असं?
याचा फायदा कोणाला होतो? का एखादा विषय आपण तडीस लावून नेत नाही?
का इतका वेळच नसतो?

लवकरात लवकर विसरणे हा समाजाला लागलेला रोग तर नाही आहे? सतत नवीन नवीन का हवं असतं?

पूर्वी कधी जनता एवढी बेसब्र झाल्याची आठवत नाही. पेपरला बातमी यायची एक दोन दिवस आणि मग मधून मधून निकालाची बातमी असायची आणि त्या अनुषंगाने परत थोडी बातमी. बस!
आता म्हणजे प्रत्येकाला लवकरात लवकर बातमी पोहोचवण्याची घाई असते. त्या मागची भावना शुन्य! काय बोलायचे? एकही चॅनेल बघणे नको वाटतं.

काही महिन्यांपूर्वी जवळपास राहणाऱ्या एका मुलाने आत्महत्या केली. कामवाल्या बाईने मला आल्या आल्या सांगितले. मला उगाचच जाणवले की तिला वाईट वाटण्यापेक्षा ती बातमी तिला लवकरात लवकर मला सांगायची घाई झाली होती. ती मला पहिल्यांदा सांगते आहे याचं अप्रूप जास्त होत की काय? मी चुकीचीही असेल कदाचित..

माणूस लवकरात लवकर भांडण मिटवेल, लवकरात लवकर मतभेद मिटवेल, लवकरात लवकर एकमेकांच्या मदतीला धावून जाईल तर किती छान होईल.पण असं नाही घडतं.

आजच्या तरुणाईला सर्व गोष्टी लवकरात लवकर हव्या असतात. फास्ट फास्ट!
त्यांची ती पळापळ पाहून आपला मात्र जीव दडपतो आणि या लवकरात लवकर शब्दापासून दूर जाऊन निवांतपणा शोधावासा वाटतो... लवकरात लवकर!!!

वर्षा हेमंत फाटक, पुणे

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »