'लॉजिक' प्रत्येकाला वाटत स्वतःजवळ खुप आहे आणि दुसऱ्याजवळ काहीच नाही. आता हा पण एक तर्क आहे! माझा! ठाम!
लगेच बाह्या सरसावल्यात नं!
मोठी शहाणी आहे!
आमचा काय वरचा रिकामा आहे का?
थोडक्यात एखाद्याला मूर्ख म्हटलं की तेवढे वाईट नाही वाटत जेव्हढे वाईट लाॅजिक जरा कमीच आहे असं म्हटले की वाटतं.
खरंतर दोन घास कमावण्यासाठी या लॉजिकची काही गरज नसते, लॉजिकली स्पिकींग!
पण उत्तम आयुष्य घालवायला असते का? तर थोडीफार! हा ही तर्कच बरं का!
मग याचा अभाव असेल तर काय होतं? हा मोठाच प्रश्न आहे.
स्त्रियांच्या
दृष्टीकोनातून पाहिले तर चहा करण्यापासून ते स्वयंपाकात देखील हे उपयोगी पडतं. घरात चहापावडर कमी असेल तर ती स्त्री पाणी जास्त घालून ती पावडर जास्त वेळ उकळवेल. चहा पावडरचा चोथा होईस्तोवर! पण चहा परफेक्ट करेल. हे अगदी साध उदाहरण झाले.
तर्क हा अनुभवाचा बहीण - भाऊ काहीही असू शकतो. कारण तर्क लढवायला अकलेसोबत अनुभवही कामाला येतो. जरा जास्तच! अनुभवी माणसं तर्कशुद्ध पद्धतीने त्याची मते मांडू शकतो.
पण खरंच हे लॉजिक काय असत नक्की?
तर्कशुद्ध बोलणे, सारासार विचार करणे, एखाद्या गोष्टीचा प्रभाव काय असू शकतो ह्या दोन्ही बाजू लक्षात घेणे आणि मग निर्णयाप्रत येणे.
तार्किकदृष्ट्या एखादी घटना आपल्याला सबळ वाटते, भक्कम वाटते पण वैज्ञानिकद्ष्ट्या ती तशी असते का हे ही बघावे लागते.
तार्किकदृष्ट्या एखाद्या गोष्टीची खात्री पटली की तिला वजन येतं हे नक्की.
कधी कधी तर बघा भांडणात एखादी व्यक्ती मूळ मुद्दा सोडून भांडायला लागली की ते भांडण, वादविवाद नको वाटतं. थोडक्यात काय आपण सोडून देतो. वाद घालायलाही त्या विषयावर तर्क तर करता आले पाहिजे तरच समोरचा ते खोडून काढेल नाहीतर उगाचच बालिशपणा काय कामाचा?थोडक्यात भांडणातली मजा निघून जाते.
मध्यंतरी एका मैत्रिणीची मुलगी लग्न करायला अजिबात तयार नव्हती. आम्ही दोघी ही पूर्ण तयारीनिशी तिच्याशी वाद घालायला बसलो.
लग्न करत नाही म्हणजे काय?
लग्न करून काय फायदा होतो?ती म्हणाली.
काही काही गोष्टी फायद्यातोट्याच्या 'पलीकडच्या' असतात. आम्ही दोघी.
ठीक आहे. तुम्ही दोघी लग्नाआधी सुखी होतात की लग्नानंतर?
काही काही गोष्टी सुखदुःखाच्या 'पलिकडच्या' असतात.आम्ही म्हणालो.
ठीक आहे. तुम्ही तुमचे स्वातंत्र्य गमावलेत का लग्नानंतर?
सगळ्याच गोष्टीं स्वातंत्र्यात मोजायच्या नसतात. त्या 'पलिकडच्याही' काही गोष्टी असतात".आम्ही म्हणालो.
तिने विचारलेच, "तुम्ही दोघींनी नाव का बदलले लग्नानंतर? काय लॉजिक होतं?"
आता कत्ल का आणि इज्जतीचा सवाल होता! लाॅजिक काढते म्हणजे काय? 30/35 वर्षांचा संसार केला तो काय उगाचच!
" अग, नावात काय आहे? तूझ माहेरच नाव तरी कुठे तूझ्या हातात आहे? आणि बाईग कोणाचीतरी सोबत लागतेच शेवटी. आपलं माणूस लागतं जवळ! म्हणून नवरा हवाच! लग्न मस्ट आहे, नाव नाही. काही काही वेळा लॉजिक बिजीक गुंडाळून ठेवावे लागते.
कोणाशीही कर पण लग्न कर. आमची काही ना नाही".
ती म्हणाली, "आई आणि मावशी नक्की तुम्ही दोघीच हे बोलता आहात नं? तुमच्या दोघींच्या त्या 'पलीकडच्या' गोष्टी माझ्या डोक्यावरुन गेल्या. दरवेळेस काय ग त्या पलिकडेही काहीतरी असतं असं म्हणत होत्या. जरातरी वेगळे शब्द वापरायचेत. काहीच लॉजिक नव्हते त्यात!!!! नो बिरबल मटेरियल! पण असू दे. मी समजून घेईन."
पण ती पुढे जे बोलली ते ऐकून आम्ही दोघी अवाक झालो.
"मी लग्न करेन पण एका अटीवर! आई माझ्याआधी तू पुनर्विवाह करायचा".
काय? माझी मैत्रीण किंचाळलीच!
"अग आत्ताच तर तुम्ही दोघींनी मला छानपैकी लग्नाचे महत्त्व पटवून दिलेन! तो नियम सर्वांनाच लागू होतो. लहान वयात बाबा गेले. तू मागे एकटी उरलीस.मला नीटपणे सांभाळलेस. तू पण परत लग्न केले तरच मी पण करेन. नाहीतर नाही, तू माझ्यामागे एकटी कशी राहशील?"
माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा हा तर्क ऐकून आम्ही दोघीही गार पडलो पण अर्थात माझी मैत्रीण तर्क वितर्क मांडत का होईना खिंड लढवत होती पण मी मात्र आता सपशेल माघार घेतली होती आणि तिच्या मुलीच्या बाजूने झाली होती मैत्रीणीचा एकटेपणा, तिचे दुःख मी बघितले होते. शेवटी मैत्रीण पुनर्विवाहाला तयार झाली.
मुलीने तिच्या आईला तर्कशुद्ध रीतीनं पुनर्विवाहाचे महत्त्व पटवून दिले होते. आमचेच तर्क तिने आमच्याच गळी उतरवले होते आणि आमची विकेट घेतली होती. अर्थात यात प्रेमाचा भागही होताच. पण तिने आमचा वैचारिक कोथळा काढला होता हे मात्र नक्की. आम्ही पार जमीनीवर आलो होतो.
म्हणून म्हणते तर्क बिर्क जाऊद्या. समोरच्याचा तर्क मेंदूला पटला नाही पण मनाला पटला तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. प्रेम, आपुलकी, मायाममता ह्या गोष्टी तर्काच्या पलिकडल्या आहेत.
कारण मेंदू एवढेच मनही महत्त्वाचे आहे. कसे? ते तुमच्या मनाला विचारा की!
आता हा तर्क पटतो का पहा बाॉ! का लॉजिक चा अभाव वाटतो यात!!! जरासा !!